नाशिक : महिनाभरात शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता. यावर सत्ताधारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत प्रत्युत्तर दिले.
महाजन यांनी म्हटले, “आपण सत्तेत असताना आरक्षण आणि कर्जमाफीसाठी काय केले? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आम्ही अनेक निर्णय घेतले. त्यामुळे सुळे यांना बोलण्याचा अधिकार नाही. सरकारच्या वतीने शेतमालांचे पंचनामे सुरू आहेत आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम चालू आहे. विरोधकांकडे आता कोणतेच काम राहिलेले नाही.”
त्यांनी पुढे म्हणाले की, “कुंभमेळ्याची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांना मदत करत आहोत. सत्तेत असताना तुम्ही घरातून बाहेर पडला नाहीत आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. आता निवडणुका असल्याने मोर्चा काढत आहात.”
आरक्षणासंदर्भात महाजन यांनी दिलासा दिला की, “ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मनोज जरांगे यांना कायद्याच्या चौकटीत जे पाहिजे होते, ते दिले गेले आहे. काहीजण न्यायालयात देखील गेले आहेत; त्याबाबत आम्ही सरकार म्हणून ताकदीने उभे राहू.”
शेतकरी, आरक्षण आणि कुंभमेळा यासंदर्भातील आरोपांवर प्रतिउत्तर देताना महाजन म्हणाले, “कुंभमेळ्याच्या कामात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. सर्व काम व्यवस्थित सुरू आहे. निधी उपलब्ध होईल तसे कामे होत राहतील.”
यावेळी महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याच्या उद्घाटन सोहळ्यात महाजन उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी शेतकरी हिताचे मुद्दे, सरकारी निर्णय आणि आरक्षणासंबंधी स्पष्टता दिली.